रात्रीचे ११:०० वाजले होते. मी नेहमी प्रमाणे माझया खोलीत अभ्यास करत होतो. बाबा बैठकीतल्या पलंगावर पहुडले होते. आई नुकतेच तिचे स्वैपाक घरातले काम आटपून खाटेवर पडली होती. मी अभ्यासात गुंग होतो. बाहेर कुणाचे तरी हुंदके ऐकू येत होते. मला पहिले वाटले की मला भास झाला असावा. थोड्या वेळाने आईची हाक ऐकु आली.
“प्रसाद…प्रसाद…अरे हे बघ ना कसे करताय”
मला पहिले कळलेच नाही काय झाले आहे ते. बाबांना नेहमी पित्ताचा त्रास होत असतो. मला वाटले की आज पुन्हा काही त्रास होतोय, म्हणून मी लगेच बैठकीत धाव घेतली.
मी बैठकीतले दृश्य बघून हबकलोच. बाबा, एकदम कडक, खंभीर स्वभावाचे, ते सोबत असताना कशाचीच भीती वाटायची नाही, ते बाबा आज लहान मुलासारखे हतबल होऊन रडता आहेत.
“मी मुलांसाठी काहीच करू शकलो नाही…मी आयुष्यात तुलाही कधी काहीच सुख देऊ शकलो नाही..मुलांची हौस-मौज नाही की काही नाही..” बाबा आईजवळ आपल्या मनातला बांध फोडून रडत होते. आईला काय करावे काही सुचत नव्हते. ती मला आणि बहिणीला हाका मारून बोलावत होती.
“अहो..असे काय करताय..शांत व्हा..सगळे ठीक होईल..सगळं चांगलेच तर चालले आहे..तुम्ही असे धीर सोडू नका..”
गरिबी, पैसा माणसाला इतका हतबल करू शकतो? पैसा हा माणसाच्या जिवापेक्षा मोठा झाला आहे?..आमची परिस्थिती तशी बेताचीच होती. बाबांची सरकारी नोकरी, पगारात जेमतेम भागात होते. आई शिवणकाम, कुकिंग क्लासेस वैगरे करून हातभार लावत होती. मोठ्या बहिणीचे नुकतेच लग्न झाले होते. त्यामुळे कर्जाचा डोंगर उभा होतो. शिवाय दुसर्या बहिणीचे लग्न, माझया शिक्षणाचा खर्च, हे होतच की. बाबांच्या मनावरील ताण बरेच दिवस झाले जाणवत होता. तो ज्वालामुखी आज फुटला होता.
“प्रसाद..जा तर शेजारच्या काका ना बोलाव…”. आईच्या या वाक्याने मी भानावर आलो. मला अक्षर:हा काय करावे ते कळत नव्हते. मी तिथे दगडा प्रमाणे उभा होतो. माझया लहान वयाला हे सगळे कळण्याच्या पलीकडे होते. मला बाबांजवळ जाण्याची हिंमत होत नव्हती. मी जाण्याचा प्रयत्न करत होतो पण, मला असे वाटत होते की माझे पाय जमिनीत खोलवर रोवळ्या गेले आहेत.
मी कशीबशी हिंमत करून बाबाजवळ गेलो. बाबांचा हात हातात घेतला. त्यांना धीर देत म्हटले, “बाबा तुम्ही शांत व्हा..तुम्ही उगाचीच काळजी करता आहात..सगळं ठीक होणार”.
आम्ही सगळे बाबांची समजूत काढत होतो. काही वेळाने ते वादळ शांत झाले. मला बाबांचा खूप राग यायचा जेव्हा मी मागितलेली गोष्ट बाबा नाकारायचे, पण त्या दिवसा पासून मला कधी बाबांकडे हट्ट करावासा वाटळाच नाही. ते म्हणतात ना “दगडाची ठेच” माणसाला शहाणं करते ते. तशीच त्या दिवशीची ती “अश्रूंची ठेच” मला शहाणं करून गेली. त्या दिवशी त्या अश्रूंनी मला एक नवी हिंमत दिली. आज मी जे काही आहे ते त्या दिवशी जो धडा मिळाला त्यामुळेच.
आजही तो क्षण आठवला की अंगावर काटे येतात. मनात अनेक प्रश्न येतात बाबांच्या मनात नेमके काय चालले असेलत तेव्हा? त्यावेळी त्यांच्या मनात टोकाचे विचार आले असतील का? आज “झिंग चिक झिंग..” सिनेमा पाहताना तो क्षण पुन्हा डोळ्यासमोरून गेला. सिनेमात एका गरीब शेतकऱ्याची कहाणी अगदी मनाला पिळून जाते. शेतकऱ्यासाठी हे सरकारचे एका लाखाचे अनुदान आत्महत्या थांबवण्यासाठी आहे की त्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रोस्साहन देतेय हेच कळत नाही.
आता डोळे जड झाले आहेत..पुढे काहीच लिहू शकत नाही….

khup chaan lihile aahe ho tumhi!
mala kay pratikriya dyaychi samjat nahiye..
keep writing
धन्यवाद. बरेच दीवसानी मनातले लिहितो आहे
manala sparshun gela lekh………keep it up…….